‘सीईटीपी’चे दूषित पाणी सोडणार नाही

By Admin | Updated: November 27, 2014 00:21 IST2014-11-26T23:39:30+5:302014-11-27T00:21:13+5:30

महत्त्वपूर्ण निर्णय : तळंदगे येथे झाली बैठक

'CETP' will not leave contaminated water | ‘सीईटीपी’चे दूषित पाणी सोडणार नाही

‘सीईटीपी’चे दूषित पाणी सोडणार नाही

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्लॅन्टमधून प्रक्रिया होऊन बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याची शुद्धता तपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाची व ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय प्रदूषित पाणी तळंदगे (ता. हातकणंगले) गावाच्या ओढ्यात सोडू नये, असा निर्णय राज्य औद्योगिक विकास महामंडळ, तळंदगे ग्रामपंचायत, सीईटीपी युजर इंडस्ट्रिज असोसिएशन एचआरटीएस ठेकेदार व पर्यावरण तज्ज्ञांच्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, शासकीय गायरानातील सुमारे कोट्यवधी रुपयांची साडेसतरा एकर जागा ताब्यात घेऊन त्यावरती प्रदूषित पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून ते पाणी रिसायकल पद्धतीने जमिनीमध्ये मुरविण्यासाठी नवीन एचआरटीएस प्लॅन्टची परत लाखो रुपये खर्चुन उभारणी करण्यात येणार आहे. या प्लॅन्टमुळे तळंदगे, पट्टणकोडोली व इंगळी गावातील जमिनीचा पोत बिघडण्याबरोबरच नैसर्गिक पाण्याचे स्रोतही प्रदूषित होण्याचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या धोकादायक प्लॅन्टची उभारणी न करता औद्योगिक विकास महामंडळ व उद्योजकांनी संयुक्तपणे प्रदूषित पाण्यावर चांगल्या प्रकारची प्रक्रिया करून तेच पाणी शेतीला व उद्योगांना वापरण्यासाठीच्या ‘आरओ’ प्लॅन्टचीच उभारणी करणे योग्य ठरेल, अशी मागणी उपसरपंच राजेंद्र हवालदार, सागर चौगुले, तानाजी शिंदे आदींनी यावेळी लावून धरल्याने याप्रश्नी बराच वेळ वादविवाद घडला.
पर्यावरणतज्ज्ञ एम. आर. पानसे व शिवाजी विद्यापीठाचे गोविंदवार यांनीही प्रदूषित पाणी व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)

Web Title: 'CETP' will not leave contaminated water