लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक स्थगिती करावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होत आहे, त्यासह संभाव्य लाॅकडाऊनमुळे दोन्ही गटांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. त्यात सोमवारी दाखल अर्जांची छाननी होत असून, त्याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, म्हणून सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यावर अद्याप एकही सुनावणी झालेली नाही. त्यात न्यायालयाला आज, रविवारपर्यंत सुट्टी असल्याने उद्या, सोमवारपासून न्यायालयाचे कामकाज सुरू होणार? आहे. त्यानंतर या याचिकेचा क्रमांक कधी लागतो, त्यावर सुनावणी अवलंबून आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता न्यायालय निवडणुकीला स्थगिती देईल, असे सत्तारूढ गटाला वाटते. त्यातच राज्य शासनाच्या पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय केव्हाही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे ‘गोकुळ’ निवडणुकीबाबत दोन्ही गटाकडून सावध भूमिका घेतली जात आहे. लॉकडाऊन झाले तर निवडणुकीचे काय होणार? याबाबतही उत्सुकता आहे.
दरम्यान, उद्या, सोमवारी दाखल अर्जांची छाननी होत आहे. चुरशीने ४८२ अर्ज दाखल झाले असून, त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर हे उद्या सकाळी अकरापासून छाननी सुरू करणार आहेत.
प्रचार ठेवायचा की थांबवायचा?
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यात राज्यात लॉकडाऊन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने निवडणूक होणार का? याबाबत इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे प्रचार सुरू ठेवायचा की थांबवायचा? या पेचात इच्छुक आहेत.