सदाशिव मोरे
आजरा : बंद असलेला आजरा साखर कारखाना, तोडणी मजुरांकडून होणारी प्रचंड लूट, वेळेत उसाची तोड नसल्यामुळे वाळणारा ऊस, क्रमपाळीचा उडालेला फज्जा यामुळे आजरा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. खतांचे वाढलेले दर, जंगली जनावरांचा सुरू असलेला उपद्रव, उसाच्या वजनात झालेली घट यामुळे साखर सम्राटांबद्दल तालुक्यातील शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या टोळीला ज्यांची एन्ट्री त्यालाच तोड मिळत असल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे.
आजरा साखर कारखाना झाल्यानंतर ऊस वेळेत जाणार, चांगला दर मिळणार या भ्रामक कंल्पनेत असलेल्या शेतकरी राजाला गेल्यावर्षीपासून ऊस वाळवून घालण्याची वेळ आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला आजरा साखर कारखाना गेल्यावर्षीपासून बंद आहे. उसाचे क्षेत्र वाढले आहे; पण बंद कारखान्यामुळे ऊस कारखान्याला घालविताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ऊसतोड पाहिजे असल्यास ३५०० ते ५००० पर्यंत एन्ट्री ट्रकमालकासह टोळी मुकादमाला द्यावी लागत आहे. ऊस वाळवून घालण्यापेक्षा एन्ट्री देऊन घालविला जात आहे. ऊस वेळाने जात असल्याने नवीन लागण व आहे त्या उसाला पाण्याची कमतरता भासत आहे. पाठविलेल्या उसाची बिले महिना ते दीड महिन्यानंतर मिळत असल्याने सेवा संस्थांसह बँकांच्या कर्जाचा बोजा वाढतच आहे. वेळेत उसाची तोड होत नसल्याने ऊस पेटवून पाठविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
- तालुक्यात जवळपास ५४०० ते ५६०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. सध्या सव्वादोन लाख टन ऊस उत्पादित होतो. चालूवर्षी कारखाना बंद असल्याने शेजारील कारखान्यांनी तालुक्यातील फक्त ३० टक्के वसुली उचल केली आहे. ७० टक्के ऊस शिल्लक असल्याने शिवारभर पांढरे तुरेच दिसत आहेत.