रमेश वारके
बोरवडेः १५ एप्रिलला पावणे दोनशे वर्षानंतर बोरवडे (ता.कागल) येथील त्रिवेणी रांगणा ग्रुपने दोन हजार फुट दरीतून तोफ बाहेर काढल्यानंतर याच ग्रुपने चारच दिवसात दरीत शोध मोहिम राबविली.यामध्ये त्यांना यश आले असून दरीतील दुसरी तोफ बाहेर काढली आहे. रांगणा किल्ल्यावर ही तोफ आणली असून रांगण्याच्या कुशित ही तोफ आज विसावली. त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या या धाडसी मोहिमेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी इसवी सन १८४४ च्या सुमारास गडक-यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील सहा तोफा दरीत ढकलल्या होत्या.आता अनेक वर्षानंतर या तोफा त्रिवेणी रांगणा ग्रुपचे मार्गदर्शक महादेव फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. कोकणातील नारुळ गावच्या दिशेला साधारणपणे १७०० फुट दरीत शोध मोहिमेच्या दरम्यान ही तोफ त्यांना आढळली.साडे आठ फुट लांब असणारी,अंदाजे दोन टन वजनाची,पाठीमागील तोंडेचा साडे चार फुट घेरा आणि पुढील तोंडाचा सव्वा दोन फुट घेरा असणारी ही तोफ बाहेर काढण्यासाठी त्रिवेणी रांगण्याचे कार्यकर्ते गेली तीन दिवस झटत होते.
या शोध मोहिमेत सुनिल वारके , प्रविण पाटील,बाजीराव खापरे,शरद फराकटे , अमर सातपूते , चंद्रकांत वारके , प्रकाश साठे ,जीवन फराकटे , मेजर सुनिल फराकटे , नेताजी साठे,रघुनाथ वारके , निखिल परीट, अरुण मगदूम , नेताजी सुर्यवंशी ,तानाजी साठे,बजरंग मांडवकर , अवधूत शिंगे , प्रथमेश पाटील, प्रज्योत चव्हाण ,भाऊ साठे,राहूल मगदूम हे शिवप्रेमी मावळे सहभागी आहेत.
"किल्ल्यावरील सहाही तोफा शोधून त्या रांगण्याच्या कुशित वसविणे हेच आमचे ध्येय आहे.गडावरील अवशेष दरीत पडले असून त्यांंचा ढिगारा उपसताना शेजारीच साधारणपणे १७०० फुट दरीत ही तोफ दिसली.वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर या तोफा सरकत असून प्रत्येक वर्षी या तोफा आपल्या जागा बदलत आहेत.या तोफा बाहेर काढणे धोकादायक काम आहे" - महादेव फराकटे