विश्वास पाटील / कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेच्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप व ताराराणी आघाडीमध्ये ४१-४० असाच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याची ठळक शक्यता आहे. भाजपच्या अधिकृत सूत्रांनीही त्याला दुजोरा दिला असून, स्वत: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेसुद्धा इतक्या जागा मिळण्यासाठीच आग्रही आहेत. नव्या सभागृहातील पहिला महापौर भाजपचा असेल तर त्याच्या पाठीशी ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचे भक्कम पाठबळ हवे, असा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप व ताराराणी आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यावर कुणी किती जागा लढवायच्या, हे अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. त्यामुळे जागावाटपाबाबतची विविध आकडेवारी प्रसिद्ध होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सूत्रांकडे त्याबद्दल विचारणा केल्यावर त्या पक्षाची भूमिका स्पष्ट झाली. भाजपची शहरातील आताची स्थिती अशी आहे की, वारे या पक्षाचे वाहत आहे. नवनवीन कार्यकर्तेही पक्षाकडे आकृष्ट होऊ लागले आहेत; परंतु उमेदवारी दिल्यावर निवडून येऊ शकेल असे आज या पक्षाकडे पाच ते सहाच उमेदवार आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी पक्षाला ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या वाढवायची आहे. मग त्यासाठी मधला मार्ग म्हणून ताराराणी आघाडीतून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न आहेत. खुद्द पालकमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या तपोवन प्रभागातून आमदार महादेवराव महाडिक यांचे एकनिष्ठ प्रकाश मोहिते हे निवडणूक लढविणार आहेत. त्यांची पत्नी यशोदा मोहिते यांना शेजारच्या संभाजीनगर बसस्थानक या प्रभागातून रिंगणात उतरविण्याच्या हालचाली आहेत. भाजप-ताराराणी आघाडीसह सर्वच पक्षांच्या उमेदवारांची नावे ही निवडणुकीची प्रत्यक्ष अधिसूचना लागू झाल्यानंतर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच जाहीर होतील. मंगळवारी (दि. १८) दुपारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आज, गुरुवारी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर होणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. त्यासंबंधी काही इच्छुकांनी ‘लोकमत’कडे फोन करून तुमच्याकडे यादी आली आहे का, म्हणूनही विचारणा केली; परंतु कोणताच पक्ष इतक्या लवकर यादी जाहीर करून शत्रू वाढविण्याच्या फंदात पडणार नाही. त्यातही जोपर्यंत भाजप व ताराराणी आघाडीची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी-जनसुराज्यची यादी निश्चितच होऊ शकत नाही. कारण आता भाजप-ताराराणी आघाडीकडून लढण्यासाठीच इच्छुकांची जास्त गर्दी आहे. तिथे संधी मिळत नाही म्हटल्यावर अन्य पर्याय म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी हे पर्याय त्यांच्यासमोर असतील. काँग्रेसचा पर्याय फार लांबचा आहे; कारण ‘ताराराणी’कडून इच्छुक असलेला कार्यकर्ता हा तसा महाडिक समर्थक असेल. त्याला लगेच तो शिक्का पुसून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी जुळवून घेणे इतके सोपे नाही. त्या तुलनेत त्याला राष्ट्रवादीचा पर्याय जास्त सोयीचा वाटू शकतो. भाजप असो, ताराराणी आघाडी असो की दोन्ही काँग्रेससह शिवसेना; त्यांच्याकडून कोणत्या प्रभागातून कोण रिंगणात उतरणार याची चाचपणी सुरू असली तरी या सर्वच पक्षांचे काही उमेदवार निश्चितच आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचे तर तब्बल ३८ उमेदवार असे आहेत की त्यांची नावे त्या-त्या प्रभागांतून निश्चितच झाली आहेत. त्या-त्या पक्षाचे विद्यमान नगरसेवक, प्रबळ उमेदवार यांचीही उमेदवारी निश्चित मानली जात आहे. प्रत्येक पक्षाकडून असे सुमारे पंधरा उमेदवार नक्की आहेतच. राहिलेल्या उमेदवारांचा शोध हा आपल्या कार्यकर्त्यांतून घेण्यापेक्षा दुसऱ्या पक्षांतून घेतला जात आहे. त्यामुळे जोपर्यंत ज्यांच्याकडे गर्दी जास्त आहे, त्यांची नावे जाहीर होत नाहीत तोपर्यंत इतरांचे ‘वेट अॅँड वॉच’ हेच धोरण राहील. गतनिवडणुकीत आमदार महाडिक व सतेज पाटील यांच्या वादात ताकदीचे आयते उमेदवार राष्ट्रवादीला मिळाले. त्या पक्षाचे महापालिकेतील यश असे आयात उमेदवारांमुळे मिळालेले होते. गुन्हेगारांना उमेदवारीचा ‘रेड सिग्नल’ ज्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत अशा तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीने महानगरपालिके साठी उमेदवारी देऊ नये, अशी सूचना भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने स्थानिक कार्यकर्त्यांना दिली आहे. भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेतली आणि निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. रणनीती ठरविण्यासाठी भाजप नेत्यांच्या सतत बैठका होत आहेत. गुरुवारी झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उमेदवारीचे निकष काय असावेत यावर प्रथम चर्चा झाली. उमेदवार कितीही ताकदीचा असो पण कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची नाही यावर एकमत झाले. भाजप व ताराराणीचे उमेदवार हे स्वच्छ प्रतिमा असलेले राहतील याकडे गांभीर्याने लक्ष द्या, अशी सूचना यावेळी देण्यात आली. रोड शो कधी घ्यावेत, कोणत्या नेत्यांच्या सभा घ्याव्यात, त्या कुठे घ्याव्यात या अनुषंगाने चर्चा झाली. भाजप आणि ताराराणी आघाडी यांचा प्रचार संयुक्त राहील, त्यामध्ये एकवाक्यता ठेवण्यावर बैठकीत भर दिला. महाडिक गटाचे कार्यकर्ते कमळ हातात घेणार यातील सगळ्यांत महत्त्वाची मेख अशी आहे की, ताराराणी आघाडीची सत्ता आली तरी आमदार महाडिक यांचा जेवढा राजकीय फायदा होणार त्याहून जास्त फायदा भाजपचे नगरसेवक जास्त निवडून येण्यात आहे; कारण भाजपला दिल्या जाणाऱ्या चाळीसपैकी तब्बल तीसहून जास्त प्रभाग हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आहेत. ‘दक्षिण’मध्ये तीस पूर्ण व दहा अर्धे प्रभाग येतात. तीसपैकी भाजपचे जेवढे जास्त नगरसेवक निवडून येतील, तेवढे पुढच्या विधानसभेला आमदार अमल महाडिक यांचा मतदारसंघातील पाया भक्कम होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील महाडिक गटाचेच कार्यकर्ते ‘कमळ’ हातात घेऊन रिंगणात उतरतील. महाडिक यांची भूमिका कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक हे भाजपचे आहेत. त्यांचे वडील आमदार महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे आमदार आहेत. भाऊ स्वरुप महाडिक हे ताराराणी आघाडीचे संयोजक आहेत, तर खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे कुटुंब म्हणून महाडिक यांची या निवडणुकीत नेमकी काय भूमिका असेल यासंबंधीही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. टार्गेट ‘काँग्रेसवाले’च निवडणुकीत प्रचारादरम्यान मुख्य विरोधीपक्ष हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असतील. त्यांच्यावरच टीक ा केली जावी, टीका करताना मर्यादा सांभाळा, शिवसेना हा मित्रपक्ष असल्याने त्यांच्यावर कोणतीही टीका आपणहून करू नये, अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या.
भाजप-‘ताराराणी’चा ४१-४० फॉर्म्युला
By admin | Updated: August 22, 2015 00:56 IST