इचलकरंजी : भटक्या कुत्र्यांचा नागरिकांवर होत असलेला उपद्रव रोखण्यासाठी उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीवर महानगरपालिकेने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीचे हातगाडे बंद ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिला आहे.भटक्या कुत्र्यांचा उच्छाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आठ दिवसांत दोन वेळा लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, तसेच दोन दिवसांपूर्वी विविध राजकीय पक्ष, संघटनांनी आंदोलन करीत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. निर्बिजीकरण मोहिमेत हायगय केल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी बजावली होती. शहरात उघड्यावर मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. या गाड्यावरील टाकाऊ पदार्थ उघड्यावर टाकण्यात येत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढत असून कुत्रीही हिंस्र बनत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे शहरात सायंकाळनंतर उघड्यावर विक्री करण्यात येत असलेल्या मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
आयुक्त पाटील यांनी अतिक्रमण विभागाला तोंडी आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने मांसाहार खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या न लावण्याच्या सक्त सूचना हातगाडी मालकांना दिल्या होत्या. त्यामुळे शहरातील डेक्कन चौक, शाहू पुतळा येथून येणारा मुख्य मार्ग यावरील गाड्या बंद असल्याचे निदर्शनास आले.