कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा धनादेशाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:24+5:302021-06-01T04:17:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेले जिल्हा बँकेचे कर्मचारी व गट सचिवांच्या वारसांना सोमवारी विमा धनादेशाचे बँकेचे ...

कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा धनादेशाचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेले जिल्हा बँकेचे कर्मचारी व गट सचिवांच्या वारसांना सोमवारी विमा धनादेशाचे बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
बँकेने भारतीय आयुर्विमा महामंडळाबरोबर करार करून विमासुरक्षा योजना लागू केला असून कर्मचाऱ्यांचा कोरोनासह इतर आजाराने मृत्यू झाल्यास २१ लाख रुपये व कल्याण निधीतून दोन लाख अशी २३ लाखांची मदत दिली जाते. आतापर्यंत शेती कर्ज विभागाचे उपव्यवस्थापक माधवराव रणवरे, अकाउंट्स विभागाचे उपव्यवस्थापक कुमार पाटील, ब्रॅच अकाउंटट याकूब नदाफ, शाखाधिकारी सुभाष पाटील, कॅशियर भीमराव कणेरकर, क्लार्क मुनीर इलाई बाणदार यांच्या वारसदारांना विमा धनादेशांचे वाटप करण्यात आले. बँकेने जिल्हा गटसचिव केडरच्या सहयोगातून सचिवांच्या वारसदारांना पाच लाख रुपयांची विमा सुरक्षा योजना लागू केली होती. त्याअंतर्गत भामटे येथील केदारलिंग संस्थेचे सचिव अमर कोईगडे (सडोली दुमाला) व कोवाड सेवा संस्थेचे सचिव मारुती पाटील यांच्या वारसदारांना विमा धनादेशाचे वाटप केले. या वेळी ज्येष्ठ संचालक महादेवराव महाडीक, आमदार पी. एन. पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे आदी उपस्थित होते.
पाच लाखांचा शेतकरी अपघात विमा उतरणार
बँकेने सलग दोन वर्षे शेतकऱ्यांचा अपघाती विमा उतरवला होता. गेल्या वर्षी भारती ॲक्सा इन्शुरन्स कंपनीला ८९ लाख रुपये देऊन अडीच लाख शेतकऱ्यांचा अपघाती विमा उतरवला होता. गेल्या वर्षभरामध्ये ४४ शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांप्रमाणे ८८ लाख रुपयांची भरपाई मिळाली. बँकेला नफ्यावरील करापोटी वर्षाला २० ते ३० कोटी द्यावे लागतात, त्यासाठी कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला तीन ते पाच लाखांपर्यंतची भरपाई मिळावी, अशी विमा योजना सुरू करणार आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती त्यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
फोटो ओळी : जिल्हा बँकेचे कर्मचारी याकूब नदाफ यांच्या वारसांना विमा सुरक्षा रक्कमेचा धनादेशाचे वाटप बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राजेश पाटील, अनिल पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, महादेवराव महाडीक, पी. एन. पाटील आदी उपस्थित होते. (फाेटो-३१०५२०२१-कोल-केडीसीसी)