कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव मराठा पर्यटनरेल्वेने कोल्हापुरात आलेल्या देशभरातील ७१० पर्यटकांनी शुक्रवारी पहाटे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ऐतिहासिक पन्हाळा गडाला भेट दिली.रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसी विभाग आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुढाकाराने ‘भारत गौरव पर्यटन रेल्वे’ अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर’ ही विशेष सहल सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देणाऱ्या या उपक्रमात पर्यटकांना सहा दिवसांत शिवरायांच्या जीवनाशी निगडित रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळा या किल्ल्यांसह तीर्थस्थळांचा अविस्मरणीय प्रवास घडवून आणला आहे.या योजनेंतर्गत पहिली रेल्वे शिवराज्याभिषेक दिनी ९ जून रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सवरून सुटली. ही रेल्वे शुक्रवारी पहाटे ४ वाजता कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवर दाखल झाली. जिल्हा प्रशासनाने या पर्यटकांचे पुष्प देऊन स्वागत केले. पर्यटकांनी शुक्रवारी पाचव्या दिवशी हॉटेलमध्ये स्नान आणि नाश्ता केल्यानंतर अंबाबाई मंदिराला भेट दिली. देवीच्या दर्शनानंतर पर्यटकांनी पन्हाळा किल्ला पाहिला. या पर्यटनानंतर हे सर्व पर्यटक रात्री विशेष रेल्वेने मुंबईसाठी रवाना झाले.या पर्यटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी निगडित जन्मस्थळ, निवासस्थान, राज्याभिषेक तसेच विजयी मोहिमांशी संबंधित किल्ले तसेच राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थाने पाहिली आहेत. यात रायगड किल्ला, पुण्यातील लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि सातारा येथील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे.देशभरातील ७१० पर्यटक रेल्वेतछत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव रेल्वेत ७१० पर्यटक होते. त्यापैकी ४८० जण इकॉनॉमीमधून (स्लीपर), १९० जण कम्फर्टमधून (३ एसी) आणि ४० प्रवाशांनी सुपीरियरमधून (२ एसी) प्रवास केला.
या स्थळांना दिल्या भेटीकिल्ले रायगड, पुणे परिसरातील लाल महल, कसबा गणेश मंदिर, शिवसृष्टी, किल्ले शिवनेरी, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग मंदिर, किल्ले प्रतापगड, अंबाबाई मंदिर, पन्हाळगड.
भारत गौरव मराठा पर्यटन रेल्वेच्या या सहलीतून पुस्तकातून वाचलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला, याबद्दल अभिमान वाटतो. -प्रदीप मोरे, ठाणे.शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर वास्तव्य केले आणि जेथे नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी इतिहास घडवला असा ऐतिहासिक पन्हाळगड पाहण्याची संधी आम्हा युवकांना रेल्वेने दिली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. -सूरज शंकर म्हस्कर, आष्टे, जि. पालघर.