लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मधील १८८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय नूतन संचालक मंडळाने घेतला असून उद्या, मंगळवारपासून त्यांना थांबावे लागणार आहे. यासह तीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, अजूनही काही कर्मचारी रडारवर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी दुपारी एक वाजता दूध प्रकल्प येथे नूतन संचालक मंडळाची पहिली बैठक होत आहे.
‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकूणच कामकाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न नूतन संचालक मंडळाने सुरू केला आहे. वाहतूक खर्चात कपात करण्याबरोबरच कामावर न येता पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली. तब्बल दोनशे कर्मचारी पगार ‘गोकुळ’चा आणि काम संचालकांच्या घरात करत होते. त्या सगळ्यांना कामावर येण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बहुतांशी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी भरती केलेल्या १८८ रोजंदारी कर्मचाऱ्यावरांवर गंडातर आले आहे. त्यांना उद्या, मंगळवारपासून कामावर न येण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तीन माजी संचालकांचे कर्मचारी रडारवर
एका नेत्याला मानणाऱ्या माजी ज्येष्ठ संचालकांचे कर्मचारी विद्यमान संचालकांच्या रडारवर आहेत. लोकसभा, विधानसभेसह ‘गोकुळ’च्या निवडणुकीत प्रचारात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार असून, येत्या आठ-दहा दिवसांत त्यांच्या बदल्या होणार हे निश्चित आहे.
राजकीय शह-काटशहाचे राजकारण
विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांना अध्यक्षपदावरून गेल्यानंतर त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्याच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. सत्तेत असूनही काहीच करता न आल्याचे शल्य त्यांना बोचत होते. त्यामुळे आता त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी आणण्यास सुरुवात केली आहे.
कोट-
कर्मचाऱ्यांच्या बदल्या ही प्रशासकीय बाब आहेे, त्यामध्ये कोणाच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच नाही. जिथे कर्मचारी नाहीत, त्याठिकाणी कोणालातरी काम दिलेच पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर रोजंदारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात आले, आता कायम कर्मचाऱ्यांना काम नसल्याने त्यांना कमी करावे लागले.
- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)