म्हाकवे : सोनगे (ता. कागल) येथे आदमापूर येथील बाळूमामांच्या बकऱ्यांनी शाळूचे किरळ खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन १२ बकऱ्यांचा मृत्यू झाला. २५ बकऱ्या अत्यवस्थ झाल्या होत्या.
जखमी बकऱ्यांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मगदूम, डॉ. रामदास पाटील, सूर्याजी आवळेकर यांनी तात्काळ उपचार केल्याने त्यांची प्रकृती स्थिर झाली असून, ती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी, संत बाळूमामाची बकरी येथील निपाणी राधानगरी रस्त्याशेजारी असलेल्या महादेव मजगे यांच्या शेतात सेवेकरी नागाप्पा मिरजे हे बकऱ्याचा कळप घेऊन मुक्कामाला आले होते. काल बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रानावनात फिरताना बकऱ्याच्या कळापातील सुमारे ४० बकऱ्यांनी शाळूचे किरळ खाल्ले होते. यामुळे विषबाधा होऊन बुधवारी रात्रीच १२ बकऱ्यांचा मृत्यू झाला.
हे सेवेकरी मिरजे यांच्या गुरुवारी सकाळी निदर्शनास आले. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मगदूम यांच्याशी संपर्क साधून अत्यवस्थ बनलेल्या बकऱ्यांवर उपचार करून घेतले. सध्या या बकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. मगदूम यांनी सांगितले.