लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे ऑनलाइन शिक्षण पध्दतीचा अवलंब केल्यामुळे आधीच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरला आहे, त्यात आता परीक्षाच रद्द केल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतचे १० हजार ४०० विद्यार्थी कोणत्याही मूल्यमापनाशिवाय पुढील वर्गात ढकलले जाणार आहेत.
गेले वर्षभर संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. अनेक महिने शाळाच भरल्या नाहीत. गेल्या दोन-तीन महिन्यापासून त्या सुरू झाल्या आणि कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. शासकीय निर्बंध कडक करण्यात आले. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने पहिली ते आठवी पर्यंतची परीक्षा रद्द केली.
या निर्णयामुळे महापालिकेच्या शाळेतील १० हजार ४०० विद्यार्थी परीक्षांना मुकणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून वर्षभर विद्यार्थी बरेच कष्ट घेत असतात. परंतु ऑनलाइन शिक्षण आणि आता तर परीक्षाच रद्द झाल्याने या गुणवत्तेची ऐशीतैशी झाली आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गच अद्याप सुरू झाले नाहीत. ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन लागतो. तो सर्व विद्यार्थ्यांकडे असतोच असे नाही. महापालिकेच्या शाळेतील ५९ टक्के विद्यार्थ्यांकडे असे फोन होते. त्यावर त्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले.
परंतु त्यांच्याकडे फोनच नाहीत त्यांनी पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला. शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले. परंतु प्रत्यक्ष शिकविणे आणि ऑनलाइन शिकविणे यात बराच फरक पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमालीची घसरली आहे, असे शिक्षक सांगतात. केवळ अभ्यासाची सवय तुटू नये म्हणून ऑनलाइन पध्दत अवलंबिली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मू्ल्यमापन तरी कसे करणार? असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत.