कल्याण - बहुप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक दरम्यान नागरिकांना प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतला पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा आज आढावा घेतला. या बैठकीत ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकांच्या परिवहन विभागाकडून आणि एस.टी. महामंडळकडून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत कल्याणडोंबिवलीच्या महापौर सौ. विनिता राणे, एम.एस.आर.डी.ए. चे व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी, रेल्वे रिजर्व फोर्सचे अधिकारी, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांचे वरीष्ठ अधिकारी यांच्यासहित संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या आणि शीळ - कल्याण - भिवंडी रस्त्यावरील वाहतूकीसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पत्रीपूल रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या लौंचिंग प्रक्रियेकरिता 21 व 22 नोव्हेंबर 2020 रोजी दोन दिवस प्रत्येकी 4 तासांचा मेगाब्लॉक मिळावा यासाठी मागील आठवड्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाठवपुरावा केला होता. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगसाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी दिवसा प्रत्येकी 4 तास असा एकूण 8 तासांचा पहिला मेगाब्लॉक आणि 27 व 28 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी 3 तास असा 6 तासांचा मेगाब्लॉकला मध्य रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.