लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीची संरक्षक भिंत बुधवारी पहाटे चार वाजता कोसळली. पहिल्याच पावसात किल्ल्याची भिंत कोसळल्याने दुर्गाडीच्या सुशोभीकरण, मजबुतीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे, हे उघड झाले आहे. या घटनेमुळे शिंदे, उद्धवसेना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
शिंदेसेनेचे आ.विश्वनाथ भोईर यांनी घटनेची माहिती मिळताच, किल्ले दुर्गाडी येथे धाव घेतली. पाहणीनंतर आ.भोईर यांनी सांगितले की, किल्ले दुर्गाडी हा आस्थेचा विषय आहे.
कंत्राटदाराचे काम योग्य नाही
दुर्गाडीच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी पाच कोटी याप्रमाणे १० कोटींचा निधी मंजूर केला. आताचा पटेल नावाचा कंत्राटदार याेग्य काम करीत नसल्याचे उघड झाले आहे,असे भोईर म्हणाले.
उद्धवसेनेचे नेते विजय साळवी यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ७ जानेवारी रोजी एक पत्र दिले. दुर्गाडी किल्ल्याची दुरवस्था झाल्याचे त्या पत्रात म्हटले होते. किल्ल्याचा नगररचनाकाराकडून आराखडा बनवून मजबूत बांधणी करण्याची सूचना केली होती.