जळगाव : नोकरीचे प्रलोभान दाखवून जळगावातून नाशिकला घेऊन गेलेल्या मुलीचे कोल्हापुरातील मुलाशी लग्न लावून दिल्याचा धक्का आणि कोल्हापूरच्या मंडळींकडून जिवे मारण्याच्या धमक्या, यामुळे त्रस्त झालेल्या हरिविठ्ठल नगरातील मुलीच्या पित्याने रविवारी आत्महत्या केली.
मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिलांनी अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून तिला नाशिक येथे नेले. तेथे काम न देता कोल्हापूरच्या काही जणांकडून अडीच लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. या काळात मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाली, तिचा गर्भपातही झाला. याला कंटाळून मुलगी कशीबशी घरी पळून आली आणि तिने आपबिती सांगितली.
कुटुंबीयांचा संताप पोलिसांवरही आरोप
रामानंद नगर पोलिसांनी आठ दिवस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
फसवणूक करणाऱ्या टोळीची शक्यता
या प्रकारामागे फसवणूक करणारी टोळीची शक्यता आहे. लग्नाची व्यवस्था करणाऱ्या महिलांनी मुलगी अनाथ असल्याचे सांगितले होते. या सर्व घटनेमुळे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.