फळ पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापरअमरावती दक्षता पथकासह अकोला अन्न व औषध प्रशासनाची कारवाईलोकमत इफेक्टसचिन राऊतअकोला : जिल्ह्यातील बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जाणार्या आंब्याचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी जप्त केला. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून ट्रकने येणारा आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकविला जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन आणि अमरावती येथील दक्षता पथकाने कारवाई करून, सुमारे दोन हजार ८९६ (तीन टन) किलो आंबा जप्त केला.आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून दर तिसर्या दिवशी ८ ते १० ट्रक कच्चे आंबे आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. कृत्रिमरित्या आंबा पिकविल्यानंतर, बाजारात विक्रीसाठी आणला जातो. आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जात असून, यामध्ये फॉस्फरस आणि अर्सेनिक हे मानवी शरीराला घातक रासायनिक घटक असतात. याशिवाय आंब्याचा रस पिवळ्या रंगाचा असावा आणि आंबा सडू नये, यासाठीही त्यावर अन्य रासायनिक प्रक्रिया केली जात असल्याचे वृत्त लोकमतने २ दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाच्या सहआयुक्तांनी दिले. त्यानुसार अमरावती येथील दक्षता पथक आणि अकोल्यातील अन्न व औषध प्रशासनाने बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजवर (शीतगृह) गुरुवारी छापा मारून सुमारे दोन हजार ८९६ किलो आंबा जप्त केला. जप्त केलेल्या आंब्याची किंमत बाजारभावानुसार दोन लाख रुपये असली तरी, अन्न व औषध प्रशासनाने थोक भावानुसार हा आंबा सुमारे ५५ हजार रुपयांचा असल्याचे सांगितले. जप्त केलेल्या आंब्याचा काही साठा नष्ट करण्यात आला असून, उर्वरित साठा जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तीन टन आंब्याचा साठा जप्त!
By admin | Updated: May 3, 2014 19:15 IST