जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणावरील पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजेपासून वीज खंडित झाली आहे. यामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. शनिवारी शहराला होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा अभियंता सुशील साळुंखे यांनी दिली आहे. शनिवारी शहराला पाणीपुरवठा होणार नसून, आता रविवारी पाणीपुरवठा होणार आहे. तर रविवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या ठिकाणचा पाणीपुरवठा सोमवारी होणार आहे.
४२ कोटींच्या कामासाठी ठेकेदारही न्यायालयात
जळगाव : शहरातील १०० कोटींपैकी ४२ कोटींच्या कामांमधून होणारी कामे रद्द करण्याचा ठराव महासभेत घेण्यात आला होता. या ठरावाविरोधात भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आता या कामांचा कार्यादेश देण्यात आलेल्या श्रीश्री इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनेदेखील न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
‘वॉटरग्रेस’च्या ठेक्याचे लेखापरीक्षण करा : अश्विनी देशमुख
जळगाव - शहराच्या दैनंदिन साफसफाईचे काम पाहत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या ठेक्यात सोयीच्या अटी-शर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठेक्याचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत देशमुख यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. महापालिकेने सन २०१९ पासून पुढील पाच वर्षांसाठी वॉटरग्रेस कंपनीला ७५ कोटींचा साफसफाईचा ठेका दिला आहे. वर्षाकाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. भाजपची सत्ता असताना हा ठेका देण्यात आला आहे. मात्र, या ठेकेदारामार्फत महापालिका हद्दीत साफसफाई केली जात नाही. निविदा काढताना या ठेकेदारांना सोयीच्या दृष्टीने अशा अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.