मोतीलाल सांखला हे पत्नी मीना सांखला व मुलगी रीना जैन यांना सोबत घेऊन सुरतहून मंगळवारी रात्री अकरा वाजता गाडी क्रमांक(०६५०१) ने बंगळुरूला जाण्यासाठी निघाले. प्रवासात मीना यांना कुठलाही त्रास नव्हता. मात्र, प्रवासात मध्यरात्री मीना सांखला यांना अचानक अस्थमाचा त्रास जाणवू लागला. मीना यांना अस्थमाचा हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यावर पती मोतीलाल सांखला व मुलगी रीना जैन यांनी तातडीने गाडीतील तिकीट निरीक्षकांकडे धाव घेऊन तात्काळ आरोग्य उपचाराबाबत व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच गाडीत कुणी डॉक्टर आहे का, याचाही शोध घेतला. मुलगी रीनाने आईला उपचार मिळण्यासाठी मोठ-मोठ्याने आरडाओरडही केली. मात्र, रेल्वेकडून उपचाराची कुठलीही व्यवस्था न करण्यात आल्याने मीना यांची गाडीमध्येच प्राणज्योत मालवली.
इन्फो :
रेल्वेच्या कारभारावर संताप
मुलगी रीना यांना आईची बिघडलेली तब्येत बघवत नसल्यामुळे त्यांनी तिकीट निरीक्षकांकडे अनेकवेळा विनंती केली. इतकेच नव्हे, तर संपूर्ण गाडीत फिरुन डॉक्टर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीदेखील आईला उपचार न मिळाल्याने रीना यांनी तिकीट निरीक्षकांवर चांगलांच संताप व्यक्त केला. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेकडे कुठलीही यंत्रणा नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आईचा मृतदेह पाहून प्रचंड आक्रोश केला. मुलीचा आक्रोश पाहून इतर प्रवाशांनादेखील अश्रू अनावर झाले होते.
इन्फो :
विमानाने नेला आईचा मृतदेह गावी
गाडीतच आईचे प्राण गेल्यामुळे पती मोतीलाल सांखला यांनी जळगावला मृतदेह उतरविला आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर मोतीलाल सांखला यांनी मुंबईहून खाजगी विमान मागविले. त्यानंतर विमानाने मयत मीना सांखला यांना बंगळुरू येथे नेले.
इन्फो :
या घटनेची डीआरएम यांनाही माहिती नाही :
या प्रकाराबाबत भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्यांशी `लोकमत ` प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कुठलीही माहिती नसून, तक्रार आली नसल्याचे उत्तर दिले. तसेच याबाबत सिनिअर डीसीएम युवराज पाटील यांच्याकडे चौकशी करण्यास सांगितले. यावर युवराज पाटील यांच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत जळगाव स्टेशनचे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चयनसिंग पटेल यांनी या महिलेचा गाडीत जीव गेला नसून, जळगाव स्टेशनवरुन तात्काळ रुग्णालयात उपाचारासाठी नेल्याचा दावा केला आहे. तर रेल्वे लोहमार्गाचे पोलीस हवालदार रामराव इंगळे यांनी या महिलेचा गाडीतच मृत्यू झाला असल्याचे `लोकमत`ला सांगितले.