तब्बल २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:40+5:302021-06-25T04:13:40+5:30

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासांपासून खंडित ...

Power supply restored after 24 hours | तब्बल २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

तब्बल २४ तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

Next

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे उड्डाणपुलाजवळ टाकण्यात आलेली ३३ के.व्ही. केबल किट जळाल्यामुळे २४ तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सुरळीत झाला. यामुळे अंधारात चाचपडत असलेल्या निम्मे भुसावळवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

महामार्गाचे काम सुरू असून खेडी १३२ उपकेंद्रावरून तापीनगर केंद्राला वीज जोडणी करणाऱ्या अंडर ग्राउंड ३३ के.व्ही. टेबल किट २३ रोजी सकाळी अकराला जळाली. याचा परिणाम शहराच्या वीजपुरवठ्यावर झाला. यामुळे अर्धे भुसावळकर हे अंधारात होते.

दुरुस्तीसाठी जळगावहून विशेष पथक

दुरुस्तीसाठी जळगाव येथून विशेष पथक बोलावण्यात आल्यानंतर अथक परिश्रम केल्याने १७७ मीटर ३३ के.व्ही.ची नवीन केबल टाकल्यानंतर अखेर २४ रोजी दुपारी दुपारच्या सुमारास गेल्या २४ तासांपासून खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत झाला.

तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी

दरम्यान, खंडित पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरळीत करण्यासाठी साकेगाववरून वीज जोडणी करण्यात आली होती. विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी.आर. घोरूडे, विभागीय अभियंता रवींद्र पद्मे व लाईनमनसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा जळालेली केबल बदलण्यासाठी घटनास्थळी युद्धपातळीवर कार्य करीत होता. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरच त्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड

अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड झाल्याने अर्धे भुसावळ शहर अंधारात बुडाले होते. रेल्वे रुळाकडील उत्तरेकडचा संपूर्ण भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांकडून सातत्याने वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल? याबाबत विचारणा केली जात होती. शांतीनगर, तापी नगर, जुना सातारा गरुड प्लॉट, म्युनिसिपल पार्क, जळगाव रोड, यावल रोड, मामाजी टॉकीज रोड तसेच तसेच शहरातील अनेक भागांमध्ये बत्ती गूल झाल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले.

दुष्काळात तेरावा महिना

शहरात तापी पात्रामध्ये मुबलक पाणी असूनसुद्धा शहरवासीयांचा घसा कोरडाच आहे. कधी जीर्ण जलवाहिनी लिकेज होते, तर कधी ट्रान्सफाॅर्मरमध्ये बिघाड होतो, तर कधी महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यात नको त्या ठिकाणी जलवाहिनी फुटते. अशा अनेक कारणांमुळे शहराला होणारा पाणीपुरवठा रोटेशननुसार एक ते दोन दिवस पुढे टाकला जातो. यातच दुष्काळात तेरावा महिना वीजपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम सरळ पाणीपुरवठ्यावर झाल्यामुळे ज्या भागात बुधवारी सकाळी रोटेशननुसार पाणीपुरवठा करण्यात येणार होता. तो आता पुढे ढकलला गेला आहे. तसेच येणारे पाणीसुद्धा गढूळ येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे झाले हाल

लॉकडाऊनमध्ये हाताला काम नव्हते. आता हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. मात्र ज्या व्यावसायिकांचे व्यवसाय विद्युत उपकरणावर अवलंबून असतात अशा व्यावसायिकांना बुधवारपासून मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. नागरिकांच्या घेतलेल्या ऑर्डरी वेळेवर देऊ न शकल्याने अनेकांशी तू तू मै मैसुद्धा झाले. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर कालपासून हातावर हात घेऊन बसलेल्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला गती मिळाली.

विद्यार्थ्यांचे झाले हाल

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अभ्यासाला बसलेले अनेक विद्यार्थी अंधारामुळे अभ्यास करू शकले नाही. तसेच जे विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करत होते वीज नसल्यामुळे मोबाइल चार्ज झाल्याने त्यांनाही ऑनलाइन अभ्यास करता आला नाही.

३३ के.व्ही. केबल किट जळाली होती, ती नवीन टाकली. नक्की दोष कुठे आहे ते शोधायला वेळ गेला. नंतर जळगावहून नवीन किट आणल्यानंतर संपूर्ण शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यापूर्वी साकेगाव फिडरवरून ज्या ठिकाणी शक्य झाले त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

-प्रदीप घोरूडे, कार्यकारी अभियंता, विद्युत वितरण कंपनी कार्यालय, भुसावळ

२४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. लहान मुलांचा अभ्यास बुडाला. याशिवाय विद्युत उपकरणावर अवलंबून असलेला व्यवसायही होऊ शकला नाही. तसेच पाणीपुरवठा न झाल्यामुळे हाल झाले, ते वेगळेच.

-अविनाश गवळी, व्यावसायिक, भुसावळ.

Web Title: Power supply restored after 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.