- सुशील देवकर
टेंडर नाही, मानही नाही मिळत म्हणून आले अन्...
जळगाव मनपातील भाजपामध्ये पडलेली फूट व तब्बल ३० नगरसेवक सेनेला जाऊन मिळाल्याने सेनेची आलेली सत्ता व त्यानंतर बंडखोरांची स्थिती हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच निवडणुका जिंकत असताना मनपातही पूर्ण बहुमाने सत्तेत आली. मात्र जे कुठे घडले नाही, ते जळगाव मनपात घडले. सत्ता मिळाल्यानंतरही अवघ्या दोन वर्षात भाजपात फूट पडली. ही फूट पडली त्याबाबतही रंजक चर्चा सुरू आहे. या नगरसेवकांच्या माणसांना टेंडर न मिळू देता दुसऱ्यांनाच टेंडर मिळत असल्याने नाराजी होती. तसेच कामेही होत नव्हती. नेतृत्व विश्वासात घेत नव्हते. त्यामुळे सेनेकडून आलेल्या वजनदार ऑफरचा स्वीकार करीत बंडखोरी केली. आता सेनेतही या बंडखोरांची स्थिती फारशी वेगळी नाही. वॉर्डात कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी करताच सेनेतील मुंबईच्या नेतृत्वाने तर यातील काही नगरसेवकांना तुम्ही काही मला विचारून पक्षात आले नाही, असे उत्तर दिल्याने या नगरसेवकांची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे भाजपाकडून व्हीप मोडला म्हणून कारवाईची प्रक्रिया सुरू असताना ज्या सेनेसोबत आले त्या सेनेतील नेत्यांकडूनही विश्वासात घेतले जात नसल्याने या बंडखोरांची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली असल्याची चर्चा रंगत आहे.