जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याचे मिश्रण होत आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व व तेथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तलावाच्या बाह्य सुशोभिकरणापेक्षा दूषित-दुर्गंधीयुक्त पाणी थांबविणे गरजेचे असल्याचे असे मत परिसरातील नागरिकांसह या भागात फिरायला येणाऱ्या नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तलावात गुरे-ढोरे आदी पाळीव प्राणी सोडण्यात येत असल्यामुळेही पाणी प्रदूषित होत आहे. झाडांची वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत या नागरिकांनी व्यक्त केले.
मी गेल्या १५ वर्षांपासून नियमित मेहरुण तलाव परिसरात फिरायला जातो. सध्या जळगावात फिरण्यासाठी मेहरुण तलावच एकमेव चांगले ठिकाण आहे; मात्र अलीकडे तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी, या परिसरातील होणारी वृक्षतोड, तलावात गुरा-ढोरांचा असणारा वावर, तलाव परिसरात होणारी अस्वच्छता यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा नैसर्गिक ठेवा चिरंतन राहण्यासाठी मनपाने कामांचा प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे.
होरिलसिंग राजपूत