लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्यातील बायपासचे काम जळगाव- ममुराबाद दरम्यान लेंडी नाल्याजवळ येऊन थांबले आहे. आधीच बायपासचे काम संथगतीने सुरू असताना पावसाळ्यात नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहतते त्यामुळे या कामाला मोठा ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाळधी ते तरसोद फाटा दरम्यान प्रस्तावित असलेला बायपास महामार्ग पूर्णत्वास आल्यानंतर ममुराबाद तसेच परिसरातील असोदा, भादली, आव्हाणे, फुपनगरी, कानळदा, विदगाव, डांभुर्णी, किनगाव भागातील वाहनधारकांना जळगाव शहरातून न जाता बाहेरून कमी वेळात व कमी अंतरात एरंडोल धरणगाव तसेच नशिराबाद, भुसावळकडे जाणे शक्य होणार आहे. सद्यःस्थितीत वाहनधारकांना जळगाव शहरातील वाहतुकीच्या कोंडीतून वाट काढतच मार्गक्रमण करावे लागते. त्यात बराच वेळ खर्च होऊन इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर होतो. बायपास पूर्णत्वास आल्यानंतर वाहने थेट पाळधी व तरसोद फाट्यावर जातील. साहजिक जळगाव शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी होईल. अपघातांचे प्रमाणही बऱ्याचअंशी कमी होऊ शकेल. त्यादृष्टीने बायपासचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ममुराबाद रस्त्याच्या दोन्ही बाजूला बायपास रस्त्याचे मार्किंग करून खुणा गाडल्या आहेत. प्रत्यक्षात बायपासच्या कामाला लेंडी नाल्याच्या पलिकडे कोठेही सुरूवात नसल्याने संबंधित शेतकरी अजूनही मार्किंग केलेल्या शेतीत पिके घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी लेंडी नाला ओलांडून बायपासचे काम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, आजतागायत त्याबाबतीत काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे परिसरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
----------
फोटो कॅप्शन - जळगाव-ममुराबाद दरम्यान वाहणाऱ्या लेंडी नाल्याजवळ बायपास महामार्गाचे काम येऊन थांबले आहे. (जितेंद्र पाटील)