पालकमंत्र्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे, मात्र टीका केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:49+5:302021-06-25T04:13:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या प्रश्नासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विम्याच्या प्रश्नासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत भाजपने आंदोलन केल्यामुळे राज्य शासनाला हे निकष पुन्हा बदलवावे लागले. यामध्ये कुणीही श्रेय घेत नसून, शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही मांडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माझ्या वडिलांसारखे असून, त्यांनी या मुद्द्यावर मी चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज होती; मात्र त्यांनी टीका केली, असे सांगत खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
गुरुवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर २६ रोजी भाजपच्या होत असलेल्या आंदोलनाबाबत खासदार रक्षा खडसे यांची पत्रकार परिषद ब्राह्मण सभेत पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, केळी पीक विम्याचे निकष हे राज्य शासनाने बदलविले होते; मात्र त्यावेळीही शिवसेना व इतर पक्षातील नेत्यांनी केंद्रावर खापर फोडले. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाला माघार घ्यावी लागली व पुन्हा जुने निकष लागू केले. आता सेनेच्या नेत्यांकडून हे जुने निकष पुन्हा राज्य शासनाने आणले, असे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जेव्हा निकष हटविले जातात तेव्हा केंद्र शासन जबाबदार आणि हेच निकष पुन्हा आणले जातात तेव्हा राज्य शासनाने केले असल्याचे सांगितले जाते; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्ण माहिती असून, हे निकष बदलविण्यासाठी कोणी प्रयत्न केले. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेतले तरी काहीही फायदा नाही, असे रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.