परिसंवादात सूर : चुकीच्या बाबींना सर्मथन नको, सुधारणा करण्याची गरज
धुळे : माध्यमांतून विचारांची सांगड रुजविण्यासाठी चळवळींनी पुढे यावे. विचारधारा आणि मूल्ये यांच्यात तडजोड करून चालणार नाही. यात विकास हवा, शोषण नाही, असा सूर परिसंवादातून उमटला. 'साम्ययोग साधने'च्या हीरक महोत्सवानिमित्त अग्रवाल विश्राम भवनात 'परिवर्तनवादी पत्रिकांचा संघ-समूह, कसा बनू - चालू शकतो' या विषयावर परिसंवाद झाला. पुण्याच्या सुनीती सु. र., यमाजी मालकर, रमेश ओझा, तर अध्यक्षस्थानी पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ उपस्थित होत्या. मालकर म्हणाले, पुरोगामी विचारांना आजही मान्यता आहे. परिवर्तनवादी विचार हे पत्रिकांच्या माध्यमातून मांडले जावेत. ओझा म्हणाले, समाज परिवर्तन आणि व्यवस्थेच्या बदलासाठी पत्रकारिता करावी लागेल व त्यात गांभीर्याचा अभाव दिसतो. तसेच काही पथ्ये पाळावी लागणार आहेत. सुनीती सु. र. म्हणाल्या, विचारधारा व मूल्य यांच्यात तडजोड करून चालणार नाही. चळवळींमध्ये संवाद होणे महत्त्वाचे आहे. माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख, सुगंध बरंठ, किरण सक्सेना, माजी आमदार पी.डी. दलाल, डॉ.मु.ब. शहा, रमेश दाणे, श्रावण शिंदे, विलास चव्हाण, पापालाल पवार आदी उपस्थित होते. जागतिकीकरणामुळे जुनी मूल्य-व्यवस्था मागे पडत आहे. आज पैशालाच अधिक महत्त्व दिले जात आहे. सर्वत्र प्रबोधनापेक्षा मनोरंजनावर अधिक लक्ष दिले जात आहे. चुकांचे सर्मथन करण्यापेक्षा ते सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. माणूसपण, माणुसकी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी भूमिका विद्या बाळ यांनी स्पष्ट केली.