मुख्यमंत्र्यांचे निर्देश : कॅबिनेटच्या बैठकीत पालकमंत्र्यांचा पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरिकांना कोकणच्या धर्तीवर शासनाकडून मदत दिली जाणार असून, याबाबत जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त मनुष्यबळ लावून नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली. या तिन्ही तालुक्यांमधील १०८ घरांची पूर्णत: तर ६५३ घरांची पूर्णपणे हानी झाली असून, ३०६ दुकाने क्षतीग्रस्त झाली आहेत. ४०४ लहान तर ६१४ मोठी गुरे वाहून गेली असून, तब्बल १५,१९५ हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळपिकांचे नुकसान झाल्याबाबत त्यांनी मंत्रिमंडळाला अवगत केले. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तिन्ही तालुक्यांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ लावून नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून, यानंतर लागलीच मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३८ गावे झाली बाधित
१. अतिवृष्टीमुळे चाळीसगावसह परिसरात प्रचंड हानी झाली आहे. याचा फटका पाचोरा आणि भडगाव तालुक्यालाही बसला असला तरी तो तुलनेत कमी आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्याला याचा मोठा फटका बसला आहे. या आपत्तीची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ चाळीसगाव तालुक्याला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला होता. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले होते.
२. बुधवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची सविस्तर माहिती दिली. या आपत्तीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ४२, पाचोऱ्यातील ४, तर भडगावमधील २ असे एकूण ३८ गावे बाधित झाली आहेत. या गावांमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
सरकार जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी : मुख्यमंत्री
शेतकरी आधीच अडचणीत असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. यामुळे त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. त्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी बळ लावून सुरू असलेल्या पंचनाम्यानुसार नुकसानीचे प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून यावरून तत्काळ मदत जाहीर करता येईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कोकणच्या धर्तीवर ही मदत आपदग्रस्तांना तातडीने प्रदान करण्यात येणार असल्याची ग्वाहीसुध्दा मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.