कोरोनाचे सर्व नियम पाळूनही पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा अतिरेक होत असल्याच्या भावना धरणगावकरांमध्ये व्यक्त होत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस खात्याने संयुक्त कारवाई करावी व पोलिसांच्या दंडाच्या ५० टक्के रक्कम पोलीस खात्याकडे जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले होते. परंतु प्रशासनाकडून सरसकट कारवाई सुरू असल्यामुळे धरणगावातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अशा कारवाया संयुक्तरीत्या कराव्यात, असे आदेश असतानाही धरणगावात फक्त पोलीस प्रशासनच पावत्या फाडताना दिसत आहे.
धरणगाव शहरातील अनेकांची शेती उड्डाणपुलाच्या पलीकडे आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे. परंतु, उड्डाणपुलाजवळ थांबलेले कर्मचारी रिकामटेकड्यांसोबत शेतकऱ्यांवरदेखील कारवाई करत आहेत. विशेष म्हणजे याच ठिकाणी मद्याचे दुकान आहे. हे दुकान सर्व नियम मोडून दिवसभर सुरू असते. अगदी मद्यप्रेमींची याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, तरी या हॉटेलवर कारवाई होत नाही तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एका मेडिकलवर गर्दी दिसतेय म्हणून दंड आकारण्यात आला. अशाच पद्धतीने अन्य एक हॉटेलदेखील बिनधास्त पद्धतीने दिवसभर सुरू असते.
धरणगावात मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या दंडाच्या पावत्या दिल्या जात होत्या. सर्व नियम पाळूनदेखील त्रास होत असल्यामुळे गावातील अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर कारवाईचा अतिरेक होत असल्यामुळे पालिकेने पावती पुस्तक देण्याचे बंद करून टाकल्याचे कळते. त्यामुळे आता चक्क जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पावत्या वापरल्या जात आहेत. याबाबत काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना विचारणा केली असता शहरी भागातील कारवाईशी आमचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
जिल्हा परिषदेच्या पावत्या शहरी भागात फाडणे बेकायदेशीर आहे. खरं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कोणत्याही पद्धतीचा धाक कर्मचाऱ्यांवर राहिलेला नाही. त्यामुळे अशा बेकायदेशीर पद्धतीने शहरी भागात पावत्या फाडल्या जात आहेत, यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची शक्यता आहे. त्यामुळे हे पावती पुस्तक देणारे अधिकारी आणि सीईओंची चौकशी झाली पाहिजे.
माधुरी अत्तरदे, जिल्हा परिषद सदस्य
नियम पाळणारे व्यापारी आणि नागरिकांवर कारवाईचा अतिरेक योग्य नाही. पालिका प्रशासनाला गावातील सर्व व्यापारी आणि नागरिक सहकार्य करत आहेत. त्यामुळे शिस्तप्रिय नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांवरील कारवाईला विरोध आहेच. याबाबत लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे गावातील नागरिकांच्या भावना कळविल्या जातील.
-विनय भावे, शिवसेना गटनेते, धरणगाव नगरपालिका
सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतीशी निगडित कामांसाठी शेतकरी बाजारात येतात. कपाशीला पाणी भरले जात असल्यामुळे मोटारी जळण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वेल्डिंगवाल्याकडे मोटार वाईडिंग करून लगेच शेतात जावे लागते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दुपारी उशीर होतोय. अशा काळात फक्त पोलिसी कारवाईची दहशत व्हावी म्हणून कारवाईचा दंडुका उगारणे योग्य नाही. अशा कारवाईला विरोधच आहे.
-कैलास माळी, भाजप गटनेते, धरणगाव नगरपालिका
====
शहरी भागातील कारवाईत पंचायत समितीच्या नावाखाली दंड आकारणे बेकायदेशीर आहे. शहरातील कारवाईसोबत आमचा काहीही संबंध नाही?. मला तर शंका आहे की, त्या पावत्या आमच्या आहेत किंवा नाही?
- मुकुंद नन्नवरे, पंचायत समिती सदस्य
शहरात होत असलेल्या दंडात्मक कारवाई करताना चुकून शहरात पंचायत समितीच्या पावत्या दिल्या गेल्या आहेत. याबाबत दखल घेतली असून, योग्य कारवाई करू. संबंधित अधिकाऱ्याला सूचना देण्यात आल्या आहेत.
- अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, धरणगाव