Budget 21 : कोरोना काळातील आर्थिक मरगळ होणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:28+5:302021-02-05T05:54:28+5:30
जळगाव : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिल्याने सर्वच क्षेत्रात येणार भरभराट येणार असून याचा सर्वच क्षेत्रात लाभ ...

Budget 21 : कोरोना काळातील आर्थिक मरगळ होणार दूर
जळगाव : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिल्याने सर्वच क्षेत्रात येणार भरभराट येणार असून याचा सर्वच क्षेत्रात लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या सोबतच प्राप्तीकर रचना जैसे थे ठेवण्यात आल्याने कोरोनात झळ बसलेल्यांना याचा दिलासा आहे. तसेच भाग भांडवलातील खर्च वाढविल्याने आर्थिक घडी रुळावर येऊन कोरोना काळातील मरगळ दूर होण्यासही मदत होईल, असा सूर सर्वच क्षेत्रातून उमटत आहे.
कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था मंदावलेली असताना त्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पाविषयी व्यापार, उद्योग क्षेत्रातून स्वागत होत आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात कृषीसाठी मोठ्या घोषणा झाल्याने कृषी पूरक उद्योगाला त्याचा लाभ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
——————-
यंदाचा अर्थसंकल्प समाधानकारक असून यामध्ये पायाभूत सुविधा वाढणार असल्याने त्याचा मोठा लाभ होणार आहे. या मुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. वाढीव आर्थिक मदतीसाठी कोरोना काळात देण्यात आलेल्या आर्थिक मदतीसाठीच्या निधीत वाढ केल्याने दालमिल उद्योगाला लाभ होणार आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन
लघु उद्योगांसाठी मोठ्या घोषणा नसल्या तरी या विभागासाठी १५ हजार ७०० कोटी रुपयांचा विधी या विभागासाठी उपलब्ध करून दिल्याने त्याचा लाभ होईल. शिवाय कमी भांडवलात उद्योग उभारणीच्या संधीदेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे करवाढ नसल्याने दिलासा आहे.
- किशोर ढाके, अध्यक्ष, लघु उद्योग भारती.
अर्थसंकल्पात विमा कंपन्यांमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढविल्याने विदेशी कंपन्यांना आवश्यक त्या संरक्षणाच्या उपाययोजना केल्यास ही परवानगी दिली जाईल असे जाहीर केले. यामुळे जागतिक विमा कंपन्यांचा भारतात गुंतवणुकीकडे कल वाढेल. एलआयसीचा आयपीओ आणण्यात सरकार उत्सुक आहे व त्यासाठी चालू सत्रात काही तरतुदी करण्याचे सूतोवाच दिलेत. यामुळे एलआयसीच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल व ग्राहकांच्या अधिकाअधिक हिताच्या उपायोजना महामंडळाद्वारे राबवल्या जातील.
- विनोद ठोळे, सिनियर बिझनेस असोसिएट, एलआयसी
सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय चांगला असून याचा सर्वांनाच लाभ होणार आहे. शिवाय सोन्याचा काळाबाजार थांबण्यास मदत होईल. आयात शुल्कात पाच टक्के कपातीचा अंदात वर्तविला होता, तो खरा ठरला.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.
यंदाचा अर्थसंकल्प उत्तम असून पायाभूत सुविधा वाढणार असल्याने त्याचा सर्वच क्षेत्राला लाभ होईल. शिवाय जीएसटीतील ४०० कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.
- पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष, कॅट
लोखंड व इतर व्यवसायासाठी चांगले निर्णय झाल्याने त्याचे स्वागत करतो. तसेच बांधकाम क्षेत्रासाठी प्राप्तीकराविषयी चांगला निर्णय झाला आहे.
- युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महामंडळ.