कोरोनाने अनाथ झालेल्या ६२ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:50+5:302021-06-25T04:13:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने एक पालक गमावलेले ४०३ बालक आहेत. तर १३ जणांनी कोविडमुळे दोन्ही पालकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने एक पालक गमावलेले ४०३ बालक आहेत. तर १३ जणांनी कोविडमुळे दोन्ही पालकांना गमावले आहे. त्यातील ६२ बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच १८४ महिला विधवा झाल्याची माहितीदेखील महिला आणि बालकल्याण विभागाला प्राप्त झाली आहे. या बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बैठक घेतली; तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या बालकांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीस जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. के. शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, आरिफ शेख, वैजयंती तळेले, योगेश मुकावार, भानुदास येवलेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की,‘ पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा ११०० रुपये शासनामार्फत बाल संगोपन योजनेद्वारे देण्यात येतात. या योजनेचा लाभ पात्र बालकांना तातडीने मिळाला पाहिजे. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यासोबतच बालकांचे वारसा हक्क अबाधित राहतील, त्यांना आवश्यक असलेले वारस प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
- दोन्ही पालक गमावलेली बालके - १३
- एक पालक गमावलेली बालके ४०३
- विधवा झालेल्या महिला १८४