जळगाव- भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यात २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान जागर यात्रा फिरणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या जागर यात्रेचा शुभारंभ झाला.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमात देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले. तसेच या जागर यात्रेत दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या कलापथकाव्दारे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जागर करण्यात येणार आहे. देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व आत्मनिर्भर भारताचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा जिल्हाभरात फिरणार असून कोविडचे नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.