लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील रावेर, यावलसह जळगाव तालुक्यातील तापी नदीच्या काठावर केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी यासाठी डांबरीकरण केलेल्या रस्त्यांनी नेहमी डागडुजी करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन केळी उत्पादन होत असलेल्या क्षेत्रात कॉंक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
शुक्रवारी तालुक्यातील किनोद येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे होते. यावेळी शिक्षकसेना जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, डॉ.कमलाकर पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण,संजय पाटील, जि.प. पवन सोनवणे, मुकेश सोनवणे, पंचायत समिती सभापती ललिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांच्यासह परिसरातील १५ सरपंच उपस्थित होते.
किनोदला स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करणार
किनोदसह परिसरासाठी ३३ केव्ही क्षमता असणारे स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. यासोबत कार्यकर्त्यांनी जनतेच्या नेहमी संपर्कात राहून लोकांची कामे करावी, असे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले. शिवसंपर्क अभियानादरम्यान भोकर पंचायत समिती गणातील ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, समाज मंदिर परिसर व इतर शासकीय कार्यालयांमध्ये ५०० वृक्ष लागवड करून जोपासना करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.