जळगाव : घरांची असो की इतर कोणतीही नोंद करण्यासाठी भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर वेळेवर कामे होत नसल्याची तक्रारी वाढत आहे. या विषयी जळगावातील अविनाश भालेराव यांनी तक्रार केली आहे.
भालेराव हे या कार्यालयात सोमवारी दुपारी गेले असता पावणेदोन वाजेपर्यंत ते बंदच असल्याचे आढळून आले. या शिवाय या कार्यालयात काही प्रकरणे दिली असता ती वेळेवर होत नसल्याचे भालेराव यांनी सांगितले व येथील अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे भालेराव यांचे म्हणणे आहे.
भालेराव यांनी घर खरेदी केले असून नोंदणीसाठी त्यांनी ११ जानेवारी रोजी प्रकरण दाखल केले. मात्र अजूनही ते काम झालेले नाही. याविषयी विचारणा केली असता काहीतरी त्रुटी काढून परत पाठविले जात असल्याचे भालेराव यांनी सांगितले.