लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखा विभागाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात ४० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १० हजारांच्यावर दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मुख्य रस्त्यावरच नागरिक बेशिस्तपणे वाहने पार्किंग करीत असल्याने सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने अनेकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच अनेकांकडून रस्त्यावर दुकाने थाटली जात असल्याने ते देखील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शुक्रवारी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, कैलास पाटील, संजय नाईक, दीपक पाटील, दीपक महाजन, योगेश पाटील, मदन पावरा, किरण उगले, सोपान मराठे या कर्मचाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी रस्त्यावर उतरून जुने साने गुरुजी रुग्णालय ते कोर्ट चौकापर्यंत कारवाई केली.
यांच्यावर झाली कारवाई
बेशिस्त पार्किंगसह नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर शुक्रवारी वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४० वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून सुमारे दहा हजार रुपयांच्यावर दंडदेखील वसूल करण्यात आला असून ही कारवाई आता दररोज केली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.