टेंभुर्णी : महिलांचे सबलीकरण व्हावे, यासाठी राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्यात आला. ग्रामपंचायतीत महिलांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. मात्र, असे असले तरी आजही ग्रामीण भागात राजकारणातील सहभाग केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर निवडणूक जिंकल्यानंतर सत्काराचा एक हारही गळ्यात पडण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र टेंभुर्णीसह परिसरात दिसून येत आहे.
टेंभुर्णीसह परिसरातील जवळपास आठ गावांत नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यात अनेक गावांतून महिला सदस्या निवडून आल्या आहेत. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतरही या महिला सदस्यांना घरातच ठेवून जागोजागी पुरुष मंडळीच सदस्य म्हणून मानसन्मान स्वीकारत आहेत.
टेंभुर्णी ग्रामपंचायतीतील १७ सदस्यांत १० महिला सदस्या निवडून आल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायतीचा निकाल लागून १५ ते १६ दिवस उलटले असले तरी गावात अद्याप एकही महिला सदस्याचा कुठे सत्कार झाल्याचे दिसून येत नाही. कुठे पती, कुठे मुलगा तर कुठे दिर या महिलांचा सत्कार मोठ्या सन्मानाने स्वीकारण्यात धन्यता मानत आहेत. अशीच परिस्थिती परिसरातील निवडणूक झालेल्या अन्य गावांतही दिसून येत आहे. या महिला सदस्यांना आता सत्काराच्या एका हारासाठी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीपर्यंत तरी अजून वाट पहावी लागणार असल्याचे अनेकजण बोलून दाखवित आहेत.
चौकट
महिलांनी राजकारणात खंबीरपणे नेतृत्व करावे म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांनी प्रथम महिलांसाठी ५० टक्के आरक्षण दिले. मात्र, आजही ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी महिलांना बाजूला ठेवून पुरुषच सत्ता गाजवित असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येते. अनेक महिला सदस्या उच्चशिक्षित असूनही त्यांनाही पुढे येऊ दिले जात नाही. अखेर हे पुरूषराज किती दिवस चालणार ? यासाठी महिलांनीही पुरुषी वर्चस्व झुगारून सक्षमपणे पुढे येणे गरजेचे आहे. महिला सदस्यांच्या सबलीकरणासाठी आम्ही भविष्यात जिल्हाभर कार्यशाळेचे आयोजन करू.
सुरेखा लहाने, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस, जाफराबाद.