भोकरदन/फकिरा देशमुख- तालुक्यात आज (18 मे) दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिली घटना केदारखेडा येथे घडली. दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका झोपडीजवळ वीज कोसळली, यात झोपडीत बसलेल्या राहुल विठ्ठल जाधव(वय 18) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचे आई-वडील आणि काका गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 18 मे रोजी राहुल विठ्ठल जाधव, त्याचे वडील विठ्ठल मुरलीधर जाधव(वय 45) आई दुर्गाबाई विठ्ठल जाधव(वय 42) व काका काकासाहेब कैतिकराव जाधव (वय 40) हे केशव सुपडा जाधव यांच्या केदारखेडा शिवारातील गट क्रमांक 207 मध्ये काम करत होते. दुपारी 3 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी हे चोघेजण शेतातील झोपडीत बसले.
यावेळी 3.30 वाजेच्या सुमारास झोपडीवर वीज कोसळली, यात राहुल विठ्ठल जाधव जागीच ठार झाला, तर त्याचे वडील, आई आणि काका गंभीर जखमी झाले. वीज कोसळण्याच्या आवाजामुळे शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेतली व जखमींना केदारखेडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरने राहुल यास मृत घोषित केले. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविले आहे.
दुसरी घटनातालुक्यातील भायडी शिवारात सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान लिंबाच्या झाडावर वीज कोसळून, झाडाखाली आडोशाला उभे असलेले रामदास आनंदा कड (वय 38,रा सिपोरा बाजार) जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींमध्ये समाधान रामराव पिसे, रामेश्वर भागाजी बर्डे, संतोष अर्जुन दळवी, गणपत नामदेव दळवी आणि दत्तू संतुकराव दळवी यांचा समावेश आहे. जखमींवर भोकरदन येथील दशरथ बाबा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.