फकिरा वाघ : जाफराबाद सहाय्यक निबंधकांना निवेदन
टेंभुर्णी : केवळ जाफराबाद तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांंत गटविमा योजनेतून गृहनिर्माण घोटाळा करून हजारो कर्मचाऱ्यांची लूट करणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कारवाई करा, अशी मागणी गृहनिर्माण संघर्ष कृती समितीचे राज्याध्यक्ष फकिरा वाघ यांनी केली. या मागणीचे निवेदन जाफराबाद सहाय्यक निबंधकांना देण्यात आले.
वाघ म्हणाले की, राज्यभरातील जिल्हा परिषदेचे शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक या योजनेत झाली असून, या घोटाळ्यात दोषी असलेल्या बिल्डर्ससह सर्वांवर शासनाने कठोर कारवाई करावी. या गृहनिर्माण घोटाळ्यात गटविमा योजनेतून कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज उचलून आज वीस वर्षे झाली तरी संबंधित कर्मचाऱ्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. या कर्जाचे व्याज आज मुद्दलीपेक्षा जास्त झाले असून, या कर्मचाऱ्यांना विनाकारण हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी अंकुश इंगळे, संजय निकम, गजानन डोमळे, सुधाकर चिंधोटे, भाऊसाहेब जाधव, सुनील अंभोरे, भगवान रक्ताडे, एन. डी. सुतार आदींची उपस्थिती होती.
फोटो
सहाय्यक निबंधकांना निवेदन देताना संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष फकिरा वाघ व पीडित कर्मचारी उपस्थित होते.