- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : माजी आमदार तथा प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मैदानात उतरणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभरात १५ जून रोजी आयोजित चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
15 जून रोजी बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या आणि मागण्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात शेतकरी संघटनांकडून चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे अंबड तालुक्यातील शहागड ते पैठण फाट्यावरील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ जरांगे देखील स्वतः रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत.
सर्व शेतकऱ्यांनी एक दिवसांचं काम बाजूला ठेऊन चक्का जाम आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत असून सर्व शेतकऱ्यांनी 15 जून रोजी शेतकरी संघटनांकडून करण्यात येणाऱ्या चक्का जाम आंदोलनात सहभागी होऊन बच्चू कडू यांना पाठिंबा द्यावा असं जरांगे यांनी म्हटलं आहे.