जालना : केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरावर शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात कृषी कायद्यांची माहिती देऊन हे कायदे रद्द करावेत, यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून प्रदेश काँग्रेसने राज्यभर १० फेब्रुवारीपर्यंत तालुका ठिकाणी शेतकरी मेळावे घेतले जाणार आहेत. कृषी विरोधी कायदे व हे कायदे मागे घेण्यासाठी जन आंदोलन उभा करून केंद्र शासनाचा निषेध नोंदविला जाणार आहे. दिल्ली येथील आंदोलनात १५५ शेतकऱ्यांनी बलिदान दिले असून, त्यांना अभिवादन केले जाणार आहे. तालुकास्तरीय मेळाव्यानंतर २० फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा आणि पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा पातळीवरील शेतकरी मेळावे यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव आदींनी केले आहे.