जालना : उत्पादनाची परवानगी नसलेल्या फॉस्फोजिप्सम पावडर खताचा विनापरवाना असलेला तब्बल ३२० मेट्रिक टन साठा कृषी विभागाच्या पथकाने रविवारी जप्त केला. या प्रकरणात मंगळवारी रात्री चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना येथील रेल्वे रेक पॉइंटवर खताचा साठा उतरविला जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा परिषद कृषी विभागाचे खत निरीक्षक विशाल धर्मराज गायकवाड व त्यांचे सहकारी पॉइंटवर गेले. तेथे पाहणी केली असता कृष्णा पोस्केम लि. मेघानगर, जि. जाबुआ (मध्य प्रदेश) या कंपनीचा खतसाठा उतरविला जात असल्याचे दिसून आले. त्यातील फॉस्फोजिप्सम पावडर खताच्या साठ्याची पाहणी केली असता, कंपनीला त्या खताचे उत्पादन करण्याची परवानगीच नसल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता तो खताचा साठा गुंडेवाडी शिवारातील भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामात साठविला जात असल्याची माहिती मिळाली.
तेथील पंचनाम्यानंतर पथकाने गोदामाची पाहणी केली असता आतमध्ये २० लाख रुपये किमतीचा तब्बल ३२० टन खताचा साठा दिसून आला. पथकाने हा साठा जप्त केला असून, या प्रकरणात खत निरीक्षक विशाल गायकवाड यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंपनीसह परवान्यातील जबाबदार व्यक्ती इंद्रराजसिंग डांगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी गुण नियंत्रण आशिष काळुशे, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी नीलेश कुमार भदाणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी विशाल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
नमुने प्रयोगशाळेतकारवाईवेळी कृषी विभागाच्या पथकाने खताचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.