वालसावंगी : येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी पॅनल प्रमुखांनी आपापले सदस्य सहलीवर पाठविले आहेत. त्यामुळे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी ग्रामपंचायत निवडणूक मोठी चुरशीची झाली. चौपाल विकास पॅनल विरुद्ध भाजपा-राष्ट्रवादीने एकत्रित येत लढा दिला. १७ पैकी दहा सदस्य राष्ट्रवादी-भाजपाचे विजयी झाले. त्यांच्याकडे बहुमत आलेले आहे, तर चौपाल पॅनलचे सात सदस्य विजयी झाले आहेत. त्यांना बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज आहे. त्यात सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे दोन्ही पॅलनकडून सरपंच आमचाच होणार असे सांगितले जात आहे. अनेक नूतन सदस्य सध्या सहलीवर आहेत. एका गटाकडे असलेले बहुमत आणि दुसऱ्या गटाकडे कमी असलेले दोन सदस्य यात सरपंचपद कोणत्या गटाकडे जाणार, ऐन वेळी कोणती राजकीय खेळी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.