लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील अहीर गवळी समाज संचलित अष्टम सामूहिक विवाह समितीच्यावतीने अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जैन विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या सोहळ्यात ७२ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.समितीच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. विवाह सोहळ्यांमधील खर्चाला फाटा देत समाजात एकता कायम राहावी या उद्देशाने १९९५ मध्ये पहिला सामुहिक विवाह सोहळा मदन भुरेवाल, पारसनंद यादव, स्व. शंकर खरे, स्व. सूर्यप्रकाश बरेठिये, मदन जटावाले, चंपालाल भगत यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता. आतापर्यंत ४२२ जोडपी विवाह बद्ध झाली आहेत. या विवाह सोहळ्यात राज्यभरातील जोडपी विवाह बद्ध होणार आहेत. सोहळ्यास केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या १३ समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती समितीच्या पदाधिका-यांनी दिली.पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष कचरुलाल भगत, पारसनंद यादव, अभयकुमार यादव, चंपालाल भगत, मनिष नंद, सुनील खरे, अनिल भुरेवाल, कैलास मेघावाले, दीपक भुरेवाल, गंगालाल भुरेवाल, गणेश नंद आदींची उपस्थिती होती.
गवळी समाजाचा विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:03 IST