जालना जिल्ह्यात गेल्या वर्षभरात वातावरणाने मोठी कूस बदली आहे. अवकाळी, तसेच परतीच्या पावसाने क्वचितच एखादा महिना असा गेला असेल की, ज्यात पाऊस पडला नाही. गेल्याच आठवड्यात बदनापूर, तसेच भोकरदन तालुक्यात गारपीट होऊन मोठे नुकसान झाले होते. या गारपिटीमुळेही अनेकांना सर्दी, खोकल्यासह तापाची लागण होत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आता कुठल्याही मेडिकलवर सर्दी आणि ताप कमी होण्याची औषधे हवी असल्यास डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असल्यासच ते देण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत, तसेच कुठल्या मेडिकलवरून दिवसभरात सर्दी आणि तापाच्या किती औषधांची विक्री झाली, याचा तपशील आयुक्त कार्यालयात कळविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता सहज ही औषणे मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोना चाचणी न करणे ठरू शकते घातक
सर्दी, तसेच ताप असतानाही अनेक जण याकडे दुर्लक्ष करून, त्यावर घरगुती औषधी घेत असल्याचे दिसून येत आहे. केवळ नाक आणि घशातून स्वॅब चमचा टाकून घेत असल्याने, त्याचा त्रास होतो, या समजुतीने अनेक जण कोरानाची चाचणी करून घेत नाहीत, परंतु यामुळे ते स्वत:सह त्यांच्या कुटुंबासाठी घातक ठरू शकतात, ही बाब लक्षात घेऊन सर्दी आणि ताप हा तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास लगेचच कोरोना चाचणी करण्याचे आवाहन डॉ.आशिष राठोड यांनी केले आहे.