भोकरदन : शहरातील रिंग रोडसाठी निधी मंजूर करून लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. चव्हाण हे जालना येथे आले असता, त्यांना निवेदन देण्यात आले.
भोकरदन शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे सिल्लोड-जालना रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते; परंतु रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. यासाठी रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी भोकरदन शहरातील रिंग रोडच्या कामासाठी लवकरच निधी दिला जाईल.
केळणा नदीवरील आलापूर व भोकरदनला जोडणाऱ्या पुलाची उंची वाढविण्यासाठीही निधी देण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, माजी आ. सुरेश जैथलिया, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, डॉ. संजय लाखे पाटील, राजेंद्र राख, शेख महेमूद, आर.आर. खडके, भीमराव डोंगरे, सत्संग मुंढे, एकबाल कुरेशी, विमल आगलावे, प्रभाकर पवार, अंकुश राऊत, भाऊसाहेब सोळुंके, राहुल देशमुख, दिनकर घेवंदे, बदर चाऊस, विजय जराड, आनंद लोखंडे, सुरेश गवळी, विठ्ठलसिंग राजपूत, आण्णासाहेब खंदारे, परमेश्वर गोते, राजेंद्र जैस्वाल, सचिन गौतम, शेख मोबीन, सोपान सपकाळ यांच्यासह कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.