जालना : खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आले होते. आता गावांची पैसेवारी शासन स्तरावरून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच ९७२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे.
मागील काही वर्षांत गतवर्षी जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यामान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेली खरीप पिके वाया गेली होती. विशेष म्हणजे नदीकाठच्या शेतांमधील तर मातीही वाहून गेली होती. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात अतिवृष्टी व पुरामळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांपैकी ५ लाख ५३ हजार ७६७ शेतकरी शासन मदतीस पात्र ठरले आहेत. या सर्वच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात सहा लाख ४२ हजार ६०४ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती; परंतु सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मूग, उडीद, कापूस सोयाबीन इत्यादी पिकांचे चार लाख ९३ हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. आता शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. जिल्ह्यातील इतर ९७१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.
मदतीचा लाभ
ज्या गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत कमी आहे, त्या गावांमधील शेतकऱ्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत देण्यात येत आहे. आजवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे.