अटल भूजल योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.आर. शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी ओंकारेश्वर बोडखे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव राठोड, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, सहायक भूवैज्ञानिक डॉ. सी.डी. चव्हाण, ए.पी. नरवाडे, सिरसाट, कविराज कुचे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, पाणीबचतीच्या उपाययोजना व जलसंधारण व भूजल पुनर्भरण व्यवस्थापनाच्या सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्वतता आणण्यासाठी राबविण्यात येणारी ही योजना असून यंत्रणेमधील विविध विभागांच्या सहकार्यातून ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ही योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून ही योजना यशस्वीरीत्या राबविण्याबरोबरच भूजल विभागाला आवश्यक असणारी माहिती येत्या आठ दिवसांमध्ये पुरविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
चौकट
१३ जिल्ह्यांत राबविली जाणार योजना
केंद्र शासन व जागतिक बँकेच्या निर्देशानुसार राज्यातील अतिशोषित, शोषित व अंशत: शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले असून केंद्राच्या भूजल अहवालानुसार राज्यातील १३ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यांमधील ७३ पाणलोट क्षेत्रातील एक हजार ३३९ ग्रामपंचायतीमधील एक हजार ४४३ गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्याच्या परतूर, जालना आणि घनसावंगी या तीन तालुक्यांंतील ५० गावांचा योजनेत समावेश आहे.