भारताच्या ऑपरेशन सिंदूरने कुख्यात दहशतवादीमसूद अजहरचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात मसूद अजहरचे भरपूर नुकसान झाले आहे. मात्र, आता पाकिस्तान सरकार त्याच्या या जखमांवर मलम लावण्याचे काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे सरकार मसूद अजहर याला नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानचे शाहबाज सरकार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला सरकारी मदत निधीतून एकूण १४ कोटी रुपये देणार आहे. ट्रिब्यून इंडियामधील एका वृत्तानुसार, पाकिस्तान सरकार दहशतवादी मसूद अजहरला भरपाई म्हणून १४ कोटी रुपये देऊ शकते. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्य मारले गेले. ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना पाकिस्तान सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. प्रत्येक मृताला १ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाईल.
मसूदला १४ कोटी कसे मिळू शकतात?भारताने केलेल्या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. शाहबाज सरकार प्रत्येक मृतासाठी १ कोटी रुपये देईल. या हिशोबाने मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ लोकांचा मृत्यू झाल्याने त्याला पाकिस्तान सरकारकडून १४ कोटी रुपये मिळतील. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने ही भरपाई जाहीर केल्याचे म्हटले जात आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी तळं उद्ध्वस्त ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. याअंतर्गत, पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ९ दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. भारताने बहलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावरही क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. जैशचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आला. येथेच मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचे मृतदेह पडले होते. भारताच्या हल्ल्यात मसूद अजहरची बहीण आणि मेहुण्यासह १४ जणांचा मृत्यू झाला.
दहशतवादी मसूद अजहरने स्वतः यांची पुष्टी केली होती की, मारल्या गेलेल्यांमध्ये त्याची मोठी बहीण आणि मेहुणे, एक पुतण्या आणि त्याची पत्नी, एक भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच मुले होती. मसूद अजहर आता त्याच्या कुटुंबात एकमेव जिवंत व्यक्ती उरला आहे.