Shehbaz Sharif On Kashmir:पाकिस्तान वेळोवेळी भारतावर गरळ ओकत असतो. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. आज(5 जानेवारी 2025) पाकिस्तानात पाकिस्तानमध्ये काश्मीरमधील लोकांसाठी आत्मनिर्णय दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर अनेक आरोप करत पुन्हा एकदा सार्वमताचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तान नेहमीच जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या आत्मनिर्णय हक्काच्या बाजूने राहिला आहे. भविष्यातही आम्ही काश्मिरींना राजकीय आणि राजनैतिकदृष्ट्या पाठिंबा देत राहू, असे शरीफ म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचा उल्लेख शाहबाज शरीफ पुढे म्हणतात, आजच्याच दिवशी 1949 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) जम्मू-काश्मीरमध्ये मुक्त आणि निष्पक्ष सार्वमताची हमी देणारा ऐतिहासिक ठराव स्वीकारला होता. शाहबाज यांनी यावर जोर दिला की, आत्मनिर्णयाचा अधिकार हे UN चार्टरचे मुख्य तत्व आहे आणि संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA) दरवर्षी आत्मनिर्णयाच्या कायदेशीर हक्काचे समर्थन करण्यासाठी ठराव पास करते. काश्मीरमधील लोकांना सात दशकांपासून हा अधिकार वापरता आलेला नाही हे दुर्दैव आहे.
पाक पंतप्रधानांचे आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहनपाक पंतप्रधान म्हणाले, आता वेळ आली आहे की, संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय समुदायाने आपल्या आश्वासनांचे पालन केले पाहिजे आणि अशी पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना त्यांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचा वापर करता येईल. त्यांनी जागतिक समुदायाला मानवाधिकारांचे उल्लंघन ताबडतोब थांबवावे, राजकीय कैद्यांची सुटका करावी आणि काश्मिरी लोकांचे मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य बहाल करावे, असे आवाहन केले.
कलम 370 चा उल्लेख जम्मू आणि काश्मीरवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी भारत अनेक कठोर पावले उचलत आहे. याची सुरुवात भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यापासून झाली, अशी प्रतिक्रिया शाहबाज शरीफ यांनी दिली. तसेच, पाकिस्तानच्या सरकारी रेडिओनुसार, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही त्यांचा देश काश्मिरी जनतेला राजकीय, राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देत राहील याचा पुनरुच्चार केला.