तरुणांच्या Gen-Z ने केलेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर नेपाळमधील के.पी. ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशात सत्तांतर झाली आहे. दरम्यान, नेपाळमध्ये झालेल्या या राजकीय उलथापालथीबाबतची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत. त्यामध्ये सोशल मीडियावर घालण्यात आलेली बंदी हे तत्कालीक कारण ठरले. सध्या नेपाळमध्ये अराजकसदृश्य स्थिती असून, के.पी. ओली यांच्यासह अनेक बडे नेते भूमिगत झाले आहेत. तर काही मंत्र्यांना जमावाकडून मारहाण करण्यात येत आहे. तसेच सध्यातरी नव्या सरकारची स्थापना कशी होईल, याबाबत कुठलीही स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, नेपाळमध्ये घडलेल्या घडामोडी आणि नंतर झालेल्या सत्तांतरासाठी एका ११ वर्षांच्या मुलीला झालेला अपघात मोठं कारण ठरल्याची माहिती समोर आली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील हा अपघात झाला होता. या अपघाताने नेपाळच्या राजकारणात असा काही भूकंप आणला की, त्यात देशातील बड्या बड्या नेत्यांचं राजकारण उदध्वस्त झालं. एवढंच नाही तर आता त्यांना जीव मुठीत धरून देशाबाहेर पळण्याची वाट पाहावी लागलं आहे. त्याचं झालं असं की, नेपाळमधील ललितपूर जिल्ह्यातील हरिसिद्धी येथे एका ११ वर्षांच्या मुलीला प्रांतीय मंत्र्यांच्या सरकारी गाडीने धडक दिली होती. या अपघातात सदर मुलगी गंभीर जखमी झाली होती. मत्र मंत्र्यांच्या वाहनाच्या चालकाने या मुलीला तिथेच टाकून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला स्थानिकांनी पकडले. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.
मात्र असं असतानाही या मंत्र्यांच्या ड्रायव्हरची २४ तासांच्या आत मुक्तता करण्यात आली. त्यामुळे लोकांच्या मनातील संताप अधिकच वाढला. असं असतानाही पंतप्रधान के.पी. ओली यांनी या घटनेचा उल्लेख क्षुल्लक घटना म्हणून उल्लेख केला. त्यामुळे संताप आणखीच भडकला. मुलीचे अपघात झालेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले गेले. ‘’मुलगी रस्त्यावर पडली आहे आणि सरकारी ताफा न थांबता निघून गेलाय’’, अशा शब्दात लोकांनी संताप व्यक्त केला.
बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावरून नेपाळमधील तरुणांमध्ये सरकारविरोधात संताप आधीपासूनच होता. तर या अपघाताना धुमसत असलेल्या असंतोषासाठी ठिणगीचं काम केलं. तसेच त्यामधून तरुणांच्या संतापाचा उद्रेक झाला. तरुण संधीची वाटच पाहत होते. त्यांना ही संधी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी देशभरात सोशल मीडियावर बंदी लादून उपलब्ध करून दिली. त्यानंतर ८ आणि ९ सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आणि त्यात देशातील सरकार उलथवले गेले. नेपाळमधील तरुणांनी संसद भवनाला घेराव घातला. राष्ट्रपती भवनापासून पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत सर्वांवर कब्जा केला गेला. मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. त्यामुळे अखेरीस ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.