मुलांचं बारसं हा सगळ्यांसाठीच, विशेषत: पालकांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. आपल्याला मुलगा होवो अथवा मुलगी, पालकांनी आपल्या बाळांची संभाव्य नावं बऱ्याच आधी ठरवून ठेवलेली असतात. मुलगा झाला तर हे नाव ठेवू किंवा मुलगी झाली तर हे नाव ठेवू. बऱ्याच जणांनी तर आपल्या आवडीच्या नावांची लिस्टच तयार करून ठेवलेली असते. बाळ झाल्यावर यातलंच एखादं नाव फिक्स करू म्हणून.जपान सरकारनं मात्र नुकताच एक नवा नियम आणला आहे. आपल्या मुलांची नावं ठेवण्याचा अधिकार तर त्यांना आहे, पण ‘कोणतीही’ नावं त्यांना ठेवता येणार नाहीत. मुलांची चित्रविचित्र नावं ठेवण्यावर त्यांनी आता रोक आणली आहे आणि त्यासंदर्भाचे नियम अधिक कठोर केले आहेत.
जपान सरकारचं म्हणणं आहे, आजकाल पालक मुलांची नावं इतकी चित्रविचित्र ठेवतात की त्यांचा साधा उच्चारसुद्धा करता येत नाही किंवा ती नावं कशी लिहायची, वाचायची हे सुद्धा कळत नाही. नव्या नियमानुसार आता पालक आपल्या मुलांची जी नावं ठेवतील, त्या नावांचं योग्य उच्चारणही सोबत द्यावं लागेल. जी नावं उच्चारता येत नाहीत किंवा त्यांचा उच्चार कळत नाही, अशी नावं स्वीकारली जाणार नाहीत. ती एक तर रद्द केली जातील किंवा त्यासाठी आणखी काही कागदपत्रांची मागणी केली जाईल.
जपानमध्ये, बाळांची नावं बव्हंशी चिनी लिपीवर आधारित वर्णात लिहिली जातात. या लिपीचं वैशिष्ट्य म्हणजे एकेका अक्षराचे अनेक उच्चार होऊ शकतात. त्यामुळे त्याचा नेमका उच्चार कसा करायचा हेच बऱ्याचदा लक्षात येत नाही. त्यामुळे नावांचं उच्चारण तर चुकीचं होतंच, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं त्याचा उच्चार करतो, ते मूल मोठं झाल्यावर त्यालाही त्याचा त्रास होतो, आपल्या नावाची त्याला लाज वाटू शकते, इतर मुलांकडून त्याला चिडवलं जाऊ शकतं, कागदोपत्री गडबड होते. हा सगळा गोंधळ दूर करण्यासाठी जपान सरकारनं आता मुलांच्या चित्रविचित्र नावांवर बंदी आणली आहे.
पालक बऱ्याचदा मुलांच्या नावांचा ध्वनी लक्षात घेतात. जो ध्वनी त्यांच्या कानांना चांगला वाटतो, मुलांचं तसंच नाव ठेवून ते मोकळे होतात; पण शाळेत, रुग्णालयात, बँकेत, सरकारी कार्यालयांत या नावांवरून बराच गोंधळ होतो. नर्सला समजत नाही, या बाळाला कोणत्या नावानं हाक मारावं, शिक्षकाला कळत नाही, याची हजेरी कशी घ्यायची, कर्मचाऱ्यांना कळत नाही, हे नाव नेमकं कसं लिहायचं, हा गोंधळ बराच वाढत चालला होता. तो कमी करण्यासाठी सरकारला हे पाऊल उचलणं आवश्यक वाटलं.
काही पालकांनी आपल्या मुलांची नावं पिकाचू, पुडिंग आणि आणखीही चित्रविचित्र ठेवली आहेत; पण सरकारच्या या नियमावरूनही जपानमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर तर अक्षरश: तुफान आलं आहे. अनेकांचं म्हणणं आहे, मुलांचं नाव काय ठेवायचं, हा संपूर्णत: पालकांचा अधिकार आहे. सरकारनं त्यात नाक खुपसू नये. मुलं पालकांची आहेत, सरकारची नाहीत, त्यामुळे सरकारनं त्यांच्या अधिकारांवर आक्रमण करू नये. काही जणांचं म्हणणं आहे, सरकारचं बरोबर आहे. यामुळे जर भविष्यात त्या मुलांनाच त्रास होणार असेल, तर आत्ताच त्याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी!