वॉश्गिंटन - ऑपरेशन सिंदूरमध्येभारतानेपाकिस्तानच्या अनेक एअरबेसवर हल्ले केले. त्यावेळी पाकच्या संवेदनशील अण्वस्त्रे ठिकाणांच्या साठ्यावरही हल्ला झाल्याचे बोलले जाते. सोशल मीडियात अनेक एक्सपर्ट हे दावे करत असले तरी भारतीय सैन्याने ते नाकारले आहे. पाकिस्ताननं ज्याठिकाणी अण्वस्त्रे ठेवली आहे त्या किराणा हिल्सला भारताने टार्गेट केले. भारताच्या या हल्ल्यामुळे पाकच्या न्यूक्लियरमधून रेडिएशन लीक होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिकेने रेडिएशन तपासणी करणारे विमान पाकिस्तानात पाठवले असा दावा करण्यात येत आहे. त्यावर अमेरिकन सरकारकडून पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.
१२ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय एअर मार्शल ए.के भारती यांनी पाकच्या किराणा हिल्सवर हल्ला केला नसल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी गंमतीशीरपणे किराणा हिल्स येथे अण्वस्त्रे आहेत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद मानले. आम्हाला त्याची माहिती नाही असंही म्हटले. मात्र सोशल मीडियात अनेक दावे करण्यात येत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडे जेव्हा विचारण्यात आले की, न्यूक्लियर रेडिएशन लीक प्रकरणी अमेरिकेची टीम पाकिस्तानात गेलीय का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी यावर सध्या माझ्याकडे बोलण्यासारखे अथवा अंदाज लावण्यासारखे काही नाही असं म्हटलं.
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी तळांना टार्गेट केले. पाकिस्तानच्या सरगोधा, नूर खान एअरबेसवरही हल्ले केले. पाकिस्तानी सैन्याच्या या दोन ठिकाणांच्या आसपास न्यूक्लियर शस्त्रसाठा आहे. भारताच्या या हल्ल्यामुळे तिथे रेडिएशन लीक झाले असा दावा सोशल मीडियात सुरू आहे. मात्र भारत सरकारने या गोष्टीचे खंडन केले. वायू सेनेने १० मे रोजी कमीत कमी ८ पाकिस्तानी एअरबेसवर निशाणा साधण्यात आला. त्याचे सॅटेलाईट फोटो पाहून हे एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट दिसते. त्यात रफिकी, मुरीदके, चकलाला, रहीम यार खान, चुनियन, पसरूर आणि सियालकोटच्या रडार सेंटर, कमांड आणि कंट्रोल सेंटर, त्याशिवाय शस्त्रसाठा डेपोचा समावेश आहे.
रावलपिंडी येथील नूर खान एअरसेब पाकिस्तानच्या न्यूक्लियर कमांड सेंटरपासून खूप जवळ आहे. सरगोधा एअरबेस तिथेही भारताने हल्ला केला, ते किराणा हिल्सपासून २० किमी अंतरावर आहे. भारताच्या या हल्ल्यानंतर न्यूक्लियर रेडिएशन लीक झाल्याचा दावा सोशल मीडियात होत असला तरी भारताने त्यास नकार दिला आहे शिवाय पाकिस्तानी सरकारनेही आतापर्यंत न्यूक्लियर आणि न्यूक्लिअर कार्यक्रमावर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडे तपासासाठी मागणी केली नाही. त्यामुळे किराणा हिल्सवरील हल्ल्याची बातमी केवळ अफवा असू शकते.