ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. २६ - चर्चवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतले असून इतर ५०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
ईश्वरनिंदा केल्याचे कळताच संतप्त जमावाने संपूर्ण ख्रिश्चन वस्ती व चर्च जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी ईश्वरनिंदेचा आरोप असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. संतप्त जमाव पोलीसस्थानकाबाहेर जमा होत त्यांनी पोलिसांकडे त्या युवकाला जनतेच्या स्वाधीन करावे अशी मागणी केली. या प्रकरणाची माहिती मिळताच ख्रिश्चन धर्मिय रहिवाश्यांनी त्यांच्या राहत्या घरातून पळ काढला. यावेळी संतप्त जमावाने ख्रिश्चन धर्मियांच्या घरांची नासधूस करत त्यांची लुटमार केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी ४० जणांना अटक केली असून इतर पाचशे जणांवर गुन्हा दाखल केला असल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी इजाझ शफी यांनी सांगितले. तसेच दंगेखोरांवर दहशतवादाची कलमे लावण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ईश्वरनिंदेची बातमी एका धर्मांध मौलवीने मशिदीतून रहिवाशांना दिली व त्यांना एकत्र जमण्याचे आव्हानही केले. या प्रकणी मौलवींवर गुन्हा दाखल झाला आहे. शबाब - ए - मिली या संघटनेचा स्थानिक नेता तारीक याने मौलवींना कळवली. ही संघटना मुलतत्ववादी जमात - ए - इस्लामी या संघटनेचाच भाग आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोलीस व निमलष्करी दलाला पाठवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पंजाब प्रांताचे गृहमंत्री नि. कर्नल , शुजा खानजादा यांनी सांगितले आहे. तर, शाहझाद मुन्शी या अल्पसंख्यांक प्रतिनिधींनी अल्पसंख्यांकांना योग्य संरक्षण दिले जावे अशी मागणी केली आहे.