यंदा ३०० ते ४०० शिक्षकांच्या बदल्या होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:28 AM2021-04-11T04:28:47+5:302021-04-11T04:28:47+5:30
संवर्ग १ व २ मध्ये दिव्यांग व पती-पत्नी एकत्रीकरण येते. यातही कुणी दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यास तथा पती-पत्नी ...
संवर्ग १ व २ मध्ये दिव्यांग व पती-पत्नी एकत्रीकरण येते. यातही कुणी दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यास तथा पती-पत्नी एकत्रीकरणासाठी अंतराची माहिती चुकीची भरल्यास संबंधितांवर थेट कारवाई होणार आहे. दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जाणार आहे.
काय बदल केले ?
पूर्वी दहा वर्षांची एकूण सेवा व एका ठिकाणी तीन वर्षे काम केलेले शिक्षक बदलीपात्र होते. आता ५ वर्षे एकाच ठिकाणी सेवा केल्यास विनंती बदली मागता येणार आहे. तर एकाच ठिकाणी १० वर्षे सेवा झालेल्या सर्वांना प्रशासकीय बदलीमध्ये पात्र ठरविण्यात येणार आहे. तर मागच्यावेळी ३० किलोमीटरच्या आत असलेले पती-पत्नी बदलीसाठी एकत्रीकरणाचा लाभ घेऊ शकत. मात्र, यावेळी ते बदलीपात्र ठरल्यास त्यांना हा लाभ मिळेल, याची शाश्वती नाही. दूरही फेकले जाऊ शकतात.
कधी होणार बदल्या?
१ ते ३१ मे दरम्यान शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के म्हणाले, साेमवारी बीईओंची ऑनलाईन बैठक होईल. त्यात पुढच्या आठवड्यात बदलीच्या विविध संवर्गात पात्र शिक्षकांच्या याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात येतील. तर ही एकूण प्रक्रिया कशी करायची, याबाबत सर्वांना माहिती दिली जाईल.
आंतरजिल्हा बदल्याही ऑनलाईन
हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी अथवा बाहेरून येण्यासाठी आंतरजिल्हा बदलीचा पर्यायही राहणार आहे. यासाठीही ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात इतर मागास प्रवर्गाच्या जागा रिक्त असल्याने या प्रवर्गातील बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना संधी मिळू शकते. बाहेर जायचे तर त्या जिल्ह्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रामदास कावरखे म्हणाले, ऑनलाईन बदल्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, एकाच ठिकाणी ५ ऐवजी ३ वर्षे सेवेच्या पूर्वीच्या नियमाप्रमाणेच बदल्या व्हाव्यात. तर पती-पत्नी एकत्रीकरणातही आता लाभ मिळेलच याची शाश्वती नसून तोही पूर्वीप्रमाणेच लाभ मिळावा.